या देशात, या महाराष्ट्र प्रांती एक असा माणूस जन्मास येऊन
गेला कि इतक्या योग्यतेचा लोकोत्तर माणूस आमच्या ह्याच समाजात जन्मास आला ह्यावर
आज विश्वास बसणे कठीण आहे.
लोकानुनयी नसलेल्या आणि म्हणूनच रूढ अर्थाने लोकाग्रणी
नसलेल्या, परंतु त्याच्या काळाच्या कित्येक दशके पुढे असलेला हा लोकविलक्षण नेता
होता – थोर समाजसुधारक, “सुधारक”कार गोपाळ गणेश आगरकर!
आगरकरांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे आणि तितक्याच तेजस्वी
आयुष्याचे ओझरते दर्शन घडवणारे हे काही मुद्दे:
- आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यात टेंभू गावी दि. १४-जुलै-१८५६म्हणजे लोकमान्य टिळकांच्या जन्माच्या केवळ ९ दिवस अगोदर झाला. टिळकांसारख्या अत्यंत प्रभावी, प्रखर व्यक्तिमत्त्वाच्या समकालीन असूनही आगरकरांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्यापुढे झाकोळून न जाता उलट टिळकांच्या समोर तितक्याच तेजस्वीपणे लखलखलेले दिसते. किंबहुना टिळकांच्या प्रखर टीकेला तितक्याच सडेतोडपणे, मुद्देसूदपणे व धीरोदात्तपणे प्रत्युत्तर देऊन सुधारक पक्षाची बाजू मांडणारे आगरकर हे एकमेव होत.
- लहानपणी घरच्या परिस्थितीमुळे आगरकरांना शिक्षणासाठी अपार कष्ट घ्यावे लागले. पण शिकण्याच्या दुर्दम्य इच्छेपायी त्यांनी केवळ १३ व्या वर्षी त्या काळात कऱ्हाड ते रत्नागिरी हा प्रवास एकट्याने पायी केला.
- पदवीच्या शिक्षणासाठी डेक्कन कॉलेजमध्ये असताना काही वेळा ते केवळ एका सदऱ्यावर राहत होते. पहाटे स्नान करून तो एकमेव सदरा ते धुवून वाळवीत व दुपारी अंगात घालून कॉलेजात जात!
- परीक्षेच्या फीसाठी पैसे नसल्याने ते मिळवण्यासाठी त्यांनी नाटक लिहायला घेतले. अर्थातच त्यात त्यांचा बराच वेळ खर्ची पडू लागला. हि गोष्ट त्यांचे त्यावेळचे सुप्रसिद्ध प्राध्यापक, गणिती केरुनाना छत्रे यांना समजली व आगरकरांसारख्या बुद्धिमान विद्यार्थ्याचे श्रम अभ्यासाव्यतिरिक्त इतर कामांत खर्च होऊ नयेत म्हणून प्रो. छत्र्यांनी आगरकरांच्या फीची व्यवस्था केली.
- पदवी व पदव्युत्तर (एम. ए.) संपूर्ण शिक्षण हे त्यांनी मिळवलेली शिष्यवृत्ती व आप्तेष्टांनी केलेली आर्थिक मदत ह्यावरच पूर्ण झाले.
- इतक्या दारिद्र्यात दिवस काढल्यानंतरही, एम. ए. केल्यावर आर्थिक सुबत्तेची सरकारी नोकरी मिळू शकत असतानाही “देशसेवा करण्यात आयुष्य घालवण्याचा” त्यांचा निश्चय पक्का झाला व ह्याच काळात आईला लिहिलेल्या पत्रात “एम. ए. झाल्यावर आपला मुलगा श्रीमंत होईल” अशी अपेक्षा न करण्याबद्दल तिला विनंती केली होती. त्यांनी लिहिले होते: “आपल्या मुलाच्या मोठाल्या परीक्षा होत आहेत, आता त्याला मोठ्या पगाराची चाकरी लागेल व आपले पांग फिटतील, असे मोठाले मनोरथ, आई, तु करीत असशील. पण मी आत्तांच तुला सांगून टाकतो की, विशेष संपत्तीची व विशेष सुखाची हाव न धरता मी फक्त पोटापुरत्या पैशावर संतोष मानून सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार.”. यावेळी आगरकरांचे वय फक्त २५ वर्षांचे होते. पंचविशीच्या वयात मोठ्या पगाराच्या नोकरीची, भावी संसाराची व सुख-स्वप्नांची स्वप्ने न बघता एक तरुण आयुष्यभर दारिद्र्याशी झगडत असूनही त्याच आर्थिक विवन्चनेची डोळसपणे निवड करतो हे पहिले म्हणजे आजही विस्मय वाटतो! विशेष म्हणजे वैय्यक्तीक पातळीवर द्रव्यसंचयाकडे पाठ फिरवणारे आगरकर त्यांच्या आर्थिक विचारांत, राष्ट्राच्या उभारणीस व उत्कर्षास त्यातील लोकांची उद्यमशीलता व द्रव्य-संचय हा आवश्यक गुण आहे हे आग्रहाने सांगतात! “स्वतंत्र भारतास सैन्याची जरुरी नाही” अशा प्रकारचे भंपक आणि अवास्तव विचार मांडणाऱ्या किंवा यंत्रांना विरोध करून चरख्यासारख्या जुनाट साधनांनी देशाला अश्मयुगात मागे ढकलणाऱ्या तथाकथित प्रतिगामी पुढाऱ्यांच्या तुलनेत त्यांच्याही ५० वर्षे अगोदर आगरकरांचा वास्तववादी, प्रगतीशील, आधुनिक दृष्टीकोन व वैय्यक्तिक पातळीवर पराकोटीचा त्याग करण्याची वृत्ती हे बावनकशी सोन्याप्रमाणे उठून दिसते!
- १८८० वर्षी न्यू इंग्लिश स्कूल चालू झाले. आगरकर हे शाळेच्या संस्थापकांपैकी व अध्वर्युंपैकीएक होते.
- १८८१ वर्षी केसरी (मराठी) व मराठा (इंग्रजी) हि दोन साप्ताहिक वर्तमानपत्रे सुरु केली. केसरी चे संपादक आगरकर होते व त्यांनी सुरुवातीची सुमारे ७ वर्षे हि जबाबदारी अतिशय निष्ठेने व प्रभावीपणे पार पाडली.
- १८८४ वर्षी डेक्कन एज्युकेशन सोसायटी ह्या संस्थेची स्थापना होऊन पुढील वर्षी संस्थेचे फर्ग्युसन कॉलेज सुरु झाले.
- शाळेत व पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्येही शिक्षक म्हणून आगरकर लोकप्रिय होते. त्यांच्या शिकवण्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणताही मुद्दा नि:संदेहपणे विद्यार्थ्यांच्या मनात ठसवणे. ते बोलताना खेळकरपणे, विनोदी पद्धतीने व्यवहारातील उदाहरणे देऊन मुद्दे समजावून देत. तसेच विद्यार्थ्यांचा कोणत्याही प्रश्नाचे न रागावता उत्तर देऊन समाधान करीत असत. ह्यामुळे एक शिक्षक म्हणूनही ते अतिशय यशस्वी व लोकप्रिय होते.
- सव्वाशे वर्षांपूर्वीच्या त्या काळातही आगरकर किती पुरोगामी होते ह्याचे एक उदाहरण म्हणजे आगरकर स्वत: नास्तिक असूनही पत्नीला देवळात जाण्यास त्यांनी कधीही आडकाठी केली नाही. यावर त्यांच्या काही विद्यार्थ्यांनीच त्यांना विचारले असता आगरकरांनी दिलेले उत्तर त्यांचे थोर चारित्र्य दाखवते. ते म्हणाले, “मी, देवळात जाण्यात अर्थ नाही असे कुटुंबाला वरचेवर सांगतो; पण तिची श्रद्धा आहे. मला जसा माझी मते बनवण्याचा हक्क आहे तसा तिलाही आहे. तिची मते बदलण्याची मी खटपट करतो पण ती बदलण्यासाठी तिचेवर जुलूम करण्याचा मला हक्क नाही.” आज १५० वर्षांनंतरही शिक्षित समाज सोडून बहुतांश समाजात आजही स्त्रिया पुरुषांच्या वर्चस्वाखाली असताना सती, बालविवाह, जरठ-कुमारीविवाह इत्यादी अनिष्ट प्रथा प्रचलित असलेल्या त्या काळात स्त्री-पुरुष समानता नुसती भाषणातच नाही तर आचरणात आणणाऱ्या आगरकरांचे मोठेपण दिसून येते.
- आपल्या मतांची आंच आपल्या सामाजिक संबंधांना लागू नये यासाठी ते किती जपत याचे एक उदाहरण: फर्ग्युसन कॉलेजमधील एक मुलगा गरिबीच्या परिस्थितीमुळे फ्रीशिपवर शिकत होता. तो विद्यार्थी, (टिळक –आगरकर वादाचे पर्यवसान म्हणून) कॉलेजातील शिक्षकांत जे दोन तट पडले होते त्यातील टिळक पक्षाचा पुरस्कर्ता होता. एका परीक्षेत तो नापास झाला, तेव्हा त्याची फ्रीशिप बंद करावी असा ठराव कॉलेजच्या शिक्षकमंडळीपुढे आला. त्यात असे सांगण्यात आले कि आम्ही याला फ्रीशिप देतो व हा गावात आम्हाला शिव्या देत सुटतो. त्यातून हा नापास झालेला; तेव्हा आता याला फीची सूट देण्याचे कारण नाही. या म्हणण्यात तथ्य होतेच. पण आगरकर म्हणाले, “मुलगा आम्हाला आमच्या मतांसाठी शिव्या देतो तर देवो बिचारा. पण मुलगा होतकरू आहे. फीची सूट मिळाली नाही तर त्याचे शिक्षण थांबेल. तेव्हा आपण त्याला सूट द्यावी.” परमतसहिष्णुता हा गुण आगरकरांमध्ये किती खोलवर रुजला होता हे वरील दोन उदाहरणांनी दिसून येते.
- १८८७ मध्ये चालक मंडळाच्या इतर सदस्यांशी तात्विक मतभेदांमुळे आगरकरांना केसरीच्या संपादकपदाचा राजीनामा देणे भाग पडले.
- त्यानंतर १८८८ मध्ये आगरकरांनी आपल्या समाज-प्रबोधनाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवता यावेत ह्यासाठी “सुधारक” वर्तमानपत्र काढले. “
- सुधारकामधून त्यांनी अनेक सामाजिक विषय मांडले. पण टीका सतत वाईट चालींवर केली – लोकांचा त्यांनी कधीच राग अथवा दुस्वास केला नाही. समाजाला त्यांनी मुलासारखे वागवले. त्याच्या चुकांवर टीका केली; प्रसंगी कोरडेही ओढले; पण समाजाचा कधी द्वेष केला नाही. आणि जि टीका केली तीही समाजाविषयीच्या आत्यंतिक कळकळीतून.
- सुधारक चालवण्यातून त्यांना आर्थिक नफा कधीच झाला नाही. उलट वाचक संख्या वाढावी म्हणून विना-मोबदला वर्तमानपत्र चालवून त्यांनी त्यायोगे खर्च कमी करून पत्राची वर्गणी कमी केली.
- टिळकांचा लोकसंग्रह पुष्कळ जास्त असल्याने अनेक वादग्रस्त प्रकरणांतील टिळकांची बाजू बरीच प्रसिद्ध असून बहुतेक लोकांस ती बरीचशी माहिती आहे. याउलट आगरकरांच्या वैचारिक सडेतोड भूमिकेमुळे त्यांच्या आयुष्यातही त्यांना लोकनिन्देचा मारा सहन करावा लागला. तसेच त्यांना पुरेसे आयुष्य न मिळाल्याने आत्मचरित्र अथवा तत्सम आठवणी लिहून ठेवण्यासही वेळ मिळाला नाही. वर्तमानपत्रीय लिखाण हे अल्पजीवी असल्याने केसरी अथवा सुधारकातून त्यांनी वेळोवेळी मांडलेली स्वत:ची बाजूदेखील आता सार्वजनिक स्मृतितून निघून गेली आहे. पण असे असले तरीही आजही जर कोणी आगरकर चरित्र वाचले वा त्यांचे लेख व खुलासे वाचले तर त्यातून त्यांच्या निष्कलंक चारित्र्याची, पराकोटीच्या नि:स्पृहतेची, सचोटीची, समाजाविषयीच्या कळकळीची, तसेच “इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार.” ह्या सुधारकाच्या परखड बाण्याची खात्री पटल्यावाचून राहत नाही.
- उठसुठ नेत्यांचे पुतळे जाळण्याची हल्ली फ्याशनच आहे; पण सनातनी विरोधकांनी काढलेली स्वत:ची अंत्ययात्रा पाहणारे आगरकर पहिले नेते होते.
- ९ ऑगस्ट १८९२ दिवशी फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे यांचे निधन झाल्यावर दुसरे प्राचार्य म्हणून संस्थेने आगरकरांची नेमणूक केली.
- आपला दुसर्याला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये ह्याची ते किती काळजी घेत ह्याचे एक आत्यंतिक उदाहरण म्हणजे पुढील प्रसंग होय. आगरकरांच्या मृत्युनंतर गोपाळकृष्ण गोखल्यांना त्यांच्या घरची पुढची व्यवस्था करण्याचा प्रसंग आला. घरातील कागदपत्रे पाहताना गोखल्यांना त्यात काही रुपये ठेवलेली एक पुरचुंडी मिळाली. तिच्यावरच्या चिठ्ठीवर लिहिले होते: “माझ्या प्रेतदहनार्थ”. आपली आर्थिक विवंचनेची परिस्थिती ओळखून आगरकरांनी आपल्या अंत्यविधीच्या खर्चाची सोय, प्रसंगी घरात पैसे नसल्याने पत्नीवर दु:खदायक प्रसंग येऊ नये व इतर आप्तेष्टांना भुर्दंड बसू नये म्हणून, स्वत:च करून ठेवली होती! ती चिठ्ठी वाचून गोखल्यांना रडू कोसळले.
- उत्तरायुष्यात टोकाचे वैचारिक मतभेद असूनही टिळक-आगरकरांचा एकमेकांवरचा वैय्यक्तिक लोभ, जिव्हाळा अखेरपर्यंत कायम होता – इतका कि आगरकरांवर केसरीत मृत्युलेख लिहिताना टिळकांसारखा अतिशय कणखर मनाचा व तात्त्विक बैठक असलेला माणूसही अश्रूंना बांध घालू शकला नाही.
लिहिण्यासारखे अजून खूप काही आहे. आगरकरांची आर्थिक, राजकीय
बाबतीतली मतेही चिंतनीय आहेत. त्यांचे शिक्षण, समाज-सुधारणा, भाषा व भाषाशुद्धि व
इतर अनेक विषयांवरचे विचार व कार्य त्यांच्या समग्र लेखनात दिसून येते.
उण्यापुऱ्या ३९ वर्षांच्या, त्यातही शेवटची काही वर्षे दुखण्यानी
ग्रस्त अशा, आयुष्यात आगरकरांना सार्वजनिक काम करण्यास जेमतेम १५-१६ वर्षेच काय ती
मिळाली. पण तेव्हढ्या अल्पावधीतही आगरकरांनी महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि
सामाजिक क्षेत्रात जे अभूतपूर्व योगदान दिले आहे ते पहिले कि मन थक्क होते व
त्यांना जर आणखी व निरोगी आयुष्य लाभले असते तर त्यांनी अजून कितीतरी लोकोत्तर
कामे करून दाखवली असती असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही. पण एव्हढा लोकोत्तर
पुरुष निदान ४० वर्षे तरी आपल्या वाट्याला आला हे आपले भाग्य!
महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या अढळ, तेजस्वी ताऱ्याप्रमाणे आगरकरांचे स्थान आहे. टिळकांच्या नंतर त्यांच्या ज्वलंत राष्ट्रवादाचा, जहाल मतांचा वारसा (स्वत:च) सांगणारे निदान काही नेते तरी पुढे
आले; पण आगरकरांच्या जहाल, सडेतोड, परखड सुधारकी विचारांचा, त्यांच्या प्रखर
तत्त्वनिष्ठेचा वारसा समर्थपणे सांगू शकेल असा एकही नेता ह्या देशात नंतरच्या १२०
वर्षांत होऊ शकला नाही हि एकच गोष्ट आगरकरांच्या अंगीकृत कार्याची दुर्धरता, त्यांची
तत्त्वनिष्ठा आणि त्यांचे एकमेवाद्वितीयत्व सिद्ध करण्यास पुरेशी ठरावी.
एखाद्या राष्ट्राच्या इतिहासाच्या विस्तृत पटावर ४०
वर्षांचा काल तसा क्षणिकच म्हणावा लागेल. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पटावर आगरकरांचे
३९ वर्षांचे आयुष्य हे एखाद्या क्षणभरच चमकणाऱ्या परंतु कोट्यावधी दिव्यांपेक्षा
जास्त प्रकाश देणाऱ्या विद्द्युल्लतेप्रमाणे चमकून गेले असेलही; परंतु त्यांचे
महान कार्य येणाऱ्या शेकडो पिढ्यांना एखाद्या दिपगृहाप्रमाणे मार्गदर्शक आणि
प्रेरणादायी ठरेल ह्यात शंका नाही!
लोकांचे अनुकरण करणारा नव्हे तर लोकांनी अनुकरण
करावे असा थोर नेता व व्यक्ति म्हणूनही तितकाच थोर असणाऱ्या महाराष्ट्राच्या ह्या
महान सुपुत्रास त्यांच्या १५९ व्या जयंतीनिमित्त शतश: विनम्र अभिवादन!